MaharashtraCoronaUpdate : राज्यात गेल्या २४ तासात ७६२० रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात दिवसभरात ७ हजार ६२० करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १८ लाख १ हजार ७०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा ९४.५१ टक्के इतका झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मागील २४ तासांमध्ये ९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण ४८ हजार ९६९ मृत्यू करोनामुळे झाला आहे. आज घडीला राज्यात ५४ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात आज 3913 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7620 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1801700 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 54573 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.51% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 23, 2020
इंग्लंडवरुन भारतात आलेल्या प्रवाशांना सरकारचे आवाहन
दरम्यान करोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विमानतळ आरोग्य अधिका-यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आर टी पी सी आर चाचणी करतील. या चाचणी मध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येतील. या तपासणीतून सदर विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची माहिती मिळेल. जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील २८ दिवस करण्यात येईल.
या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. सर्व निकट सहवासितांना ते पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून 5 व्या ते 10व्या दिवसादरम्यान आर टी पी सी आर चाचणी करण्यात येईल. जे कुणी 25 नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरुन भारतात आले आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या/ महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे अवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.