MumbaiNewsUpdate : मातोश्रीवर समस्या घेऊन आलेला शेतकरी पुन्हा सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला , आंदोलनाचा प्रयत्न

बांद्रा येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानात बँकेच्या कर्जामुळेत्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने थेट शिरण्याचा प्रयत्न केला होता. महेंद्र देशमुख असं शेतकऱ्याचं नाव आहे. त्याने जानेवारी महिन्यात हा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असं आश्वासन या शेतकऱ्याला देण्यात आलं होतं. मात्र त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही म्हणून हा शेतकरी आज पुन्हा एकदा आपल्या पत्नीसह मातोश्री या ठिकाणी आला. त्याने मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. महेंद्र देशमुख हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आहेत. महेंद्र देशमुख यांनी मातोश्रीबाहेर आज उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता.
या विषयीची अधिक महिती अशी कि , बँकेच्या कर्जामुळे त्रस्त झालेले शेतकरी महेंद्र देशमुख हे त्यांच्या पत्नी आणि लहान मुलीसह मातोश्रीवर आले होते. जानेवारी महिन्यात जेव्हा ते आले होते तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महेंद्र देशमुख तुम्हाला न्याय मिळेल असं म्हटलं होतं. मात्र अद्याप न्याय मिळालेला नाही असं सांगत आज महेंद्र देशमुख त्यांच्या पत्नी आणि मुलीसह मातोश्रीवर आले. त्यांनी उपोषणाला बसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पनवेल तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेने फसवणूक केल्याचा आरोप महेंद्र देशमुख यांनी केला आहे.
याच प्रकरणावरून शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आंदोलनही केलं होतं. या प्रकरणी त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसात चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी ६ जानेवारीला रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मातोश्रीवर आंदोलन केल्यापासून महेंद्र देशमुख चर्चेत आले होते. महेंद्र देशमुख यांनी तीन मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्वखर्चासाठी २४ फेब्रुवारी २००६ रोजी ८ लाख ४० हजार एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट खात्यात जमा केली होती. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेत त्यांची ही रक्कम जमा होती.
दरम्यान १५ मार्च २००८ रोजी महेंद्र देशमुख यांनी १० लाख २० हजार रुपये रक्कम कुटुंबातील सर्वांच्या नावे जमा केली. त्यापूर्वी २००६ आणि २००७ या वर्षाची खात्यातील एकूण जमा रक्कम अंदाजे २३ ते २४ लाखांपर्यंत होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. त्या घराची रक्कम बँकेने जवळपास ८ लाख ठरवली. त्यानुसार अंदाजे ३२ लाखापर्यंत रक्कम बँकेकडे तारण ठरवण्यात आली. मात्र तरीही ४० लाख तारण मालमत्ता दाखवण्यासाठी ८ लाख कमी पडत होते. त्यामुळे ते प्रकरण बँकेकडे सर्व कागदोपत्री स्थगित राहिले. या सर्व प्रकरणात तारण ठेवलेले जवळपास ३२ लाख रुपये परत मिळू नयेत, यासाठी कर्ज काढण्याआधीच बँकेने तीन कर्ज लेखी पत्र देऊन लादल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.