Loksabha 2019 : अखेर सुजय विखे-पाटील भाजपच्या गळाला…

अखेर नाही नाही म्हणता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या चतुराईने अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठी गांधी यांना “आऊट” करीत राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांना “ईन” करुन काॅंग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच दणका दिला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणारे अहमदनगरचे युवा नेते सुजय विखे-पाटील यांचं लोकसभेचं तिकीट पक्कं आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. ‘सुजय यांचं नाव लवकरच भाजपच्या संसदीय समितीकडं पाठवण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी आज दिली.
सुजय विखे यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुजय यांच्या उमेदवारीबद्दल जाहीर भाष्य केलं.
‘नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत. विखेंचं नाव खासदारकीसाठी भाजपच्या संसदीय समितीकडे पाठवणार आहे. तिथं त्यांचं नाव निश्चित केलं जाईल. येत्या निवडणुकीत नगरची जागा आम्ही विक्रमी मतानं जिंकू, असं सांगतानाच, महाराष्ट्रात युतीच्या ४५ जागा निवडून येतील,’ असा दावाही त्यांनी केला.
‘भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा माझा निर्णय हा वैयक्तिक निर्णय आहे. आई-वडिलांच्या मनाविरुद्ध मी हा निर्णय घेतला आहे,’ असं स्पष्ट करतानाच, ‘माझ्या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आधार देण्याचं काम केलं. मी त्यांच्यासोबत कायम राहीन,’ अशी ग्वाही सुजय विखे-पाटील यांनी यावेळी देऊन खा.दिलीप गांधी आणि शिवाजीराव कर्डिले यांचे आभार मानले.