मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अडचणीत , काँग्रेस सोडून ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या गळाला….

मध्यप्रदेशातील राजकीय बलाबल
मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. यांपैकी २ आमदारांचे निधन झाले आहे. अशा प्रकारे विधानसभेची सध्याची सदस्यसंख्या आहे २२८ इतकी. काँग्रेसकडे एकूण ११४ आमदार आहेत. तर सरकार बनवण्याचा जादुई आकडा ११५ इतकी आहे. काँग्रेसला ४ अपक्ष, २ बहुजन समाज पक्ष आणि एक समाजवादी पक्षाच्या आमदाराचे संमर्थन आहे. अशा प्रकारे काँग्रेसकडे एकूण १२१ इतके बळ आहे. तर, भारतीय जनता पक्षाकडे १०७ आमदार आहेत.
मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचे मन वळविण्यात भाजपला यश मिळाले असून त्यांनी कालच आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द करून काँग्रेसशी फारकत घेतली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान काँग्रेसला सोडण्याच्या मोबदल्यात शिंदे यांना राज्यसभेची उमेदवारी शिंदे देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुफतगू केली. या नाट्यमय घडामोडींमुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसवर नाराज होते. अखेर त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे कालच सुपूर्द केला. मध्य प्रदेश काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. शिंदे यांचे समर्थक असेलेले १९ बंडखोर आमदार देखील आपले राजीनामे देतील असे सांगितले जात आहे. आपल्या राजीनाम्यानंतर शिंदे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून उद्या भोपाळमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून आपला अर्ज भरणार आहेत.
वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्या समर्थक बंडखोर आमदारांनी देखील राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांनंतर मध्य प्रदेशातील काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना ज्योतिरादित्य शिंदे यानी आपले मनोगतही व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीपासूनच माझ्या मनात काही विचार सुरू होते. गेल्या १८ वर्षांपासूनच्या काँग्रेससोबतीनंतर आता पुढे सरकण्याची वेळ आली आहे. आता मी एक नवी सुरुवात करू इच्छितो, अशा शब्दात त्यांनी आपले मन मोकळे केले आहे.
मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे आणि वर्षभरापासून हा मार्ग मी प्रशस्त केला आहे याची तुम्हाला कल्पना आहेच. आजही मी माझे राज्य आणि देशातील लोकांचे रक्षण करण्याच्या माझे लक्ष्य आणि उद्देशांवर मी ठाम आहे, असे ज्योतिरादित्य यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.