उस्मानाबादच्या संत गोरोबा कुंभार नगरीत अवतरली साहित्याची पांढरी , अध्यक्षांनी व्यक्त केल्या मुक्त भावना…

उस्मानाबादच्या संत गोरोबा कुंभार नगरीत ९३ व्य अखिल भारतीय संमेलनाला अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. या निमित्ताने बोलताना साहित्य संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पत्रकारांशी बोलताना आपली रोखठोक भूमिका मांडली. “जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. अशा वेळी मौन राखणे हा भेकडपणा आहे”. धार्मिक अल्पसंख्याक म्हणून असुरक्षित वाटतं का? या प्रश्नावर – ‘बिलकुल वाटत नाही’, असं सांगणाऱ्या फादर दिब्रिटो यांनी ‘नागरिकत्व कायद्यामुळे विशिष्ट धर्माला लक्ष्य करणं योग्य नाही. हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून राजकारण केलं जातं ते देशाच्या अंतिम हिताचं नाही’, असंही ठामपणाने सांगितलं.
अध्यक्ष म्हणून भाषण करण्याआधी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना आपल्या भाषणामागची भूमिका स्पष्ट केली. त्यांचं लिखित स्वरुपाचं भाषण माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्यामध्ये त्यांनी विचारस्वातंत्र्याच्या बाजूने भूमिका मांडलेली दिसते. मरणदेखील सुंदर आहे. मला जे पटलंय ते मी सांगणार, असं ते म्हणाले. ‘लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे’, असं म्हणून त्यांनी लिखित भाषणात समर्थ रामदासांच्या दासबोधातल्या ओळींचा दाखला दिला.
‘जेव्हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, धर्माच्या नावाखाली भेदाभेद केला जातो, समाजाचे वांशिक शुद्धिकरण करण्याचा निर्णय घेतला जातो, एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचं स्वरूप येतं, दोष नसताना अश्राप नागरिकांवर उपासमारीची वेळ येते, उपजीविकेचं साधन हिरावून घेतलं जात, तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केली पाहिजे’, असं ते म्हणाले.
पर्यावरण की विकास या प्रश्नावर एबीपी माझाशी बोलताना फादर दिब्रिटो म्हणाले, “विकास हवा, पण पर्यावरणही महत्त्वाचं. हिरवा विकास हवा आहे. सरकार बदललंय आता पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत”.