Air Strike : भारताचा एक पायलट बेपत्ता : परराष्ट्र मंत्रालय : पाकचे लढाऊ विमान पाडले

भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत पाकचं एफ-१६ हे लढाऊ विमान पाडण्यात यश आले असले तरी या दरम्यान भारताला एक मिग-२१ विमान गमवावं लागलं असून या विमानातील पायलटही बेपत्ता आहे, अशी अधिकृत माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय लष्कराच्या चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र हा हल्ला भारताने चोख प्रत्युत्तर देऊन उधळवून लावला.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला चढवला होता. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे किमान साडेतीनशे दहशतवादी ठार झाले. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून पलटवार होईल, ही शक्यता होती आणि तसेच घडले. मात्र भारत आधीपासूनच सतर्क असल्याने पाकचा हल्ला परतवून लावण्यात यश आले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार आणि एअर व्हाइस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा हल्ला उधळवून लावण्यात आला. पाकचं एक विमान भारतीय हवाई दलाने पडले असून या कारवाईत भारताला एक मिग विमान गमवावे लागले आहे तर एक पायलट बेपत्ता आहे. हा पायलट आपल्या ताब्यात असल्याचा दावा पाकने केला असून आम्ही याबाबत खातरजमा करत आहोत, असे रवीश कुमार यांनी नमूद केले.
पाकच्या हवाई दलाचं विमान डिटेक्ट होताच लगेचच त्यावर कारवाई करण्यात आली. हे विमान पाकच्या हद्दीतच पाडण्यात आले, असेही रवीश यांनी पुढे नमूद केले. भक्कम पुरावे हाती लागल्यानंतरच भारताने पाकिस्तानातील जैशच्या तळांवर हल्ला केला. जैशचे दहशतवादी भारतात आणखी दहशतवादी हल्ला करणार असल्याची पक्की खबर आमच्या हाती होती. त्यामुळेच हवाई दलाच्या साह्याने जैशचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असे यावेळी कपूर यांनी नमूद केले.