Pakistan : पाकिस्तानच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

पुलवामा हल्ल्याचा बदला आज मध्यरात्री हवाईदलाने पूर्ण केला असून पाकमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हल्ले चढविले आहेत. यामुळे पाकिस्तानने भारतावर आगपाखड केली असून त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना केवळ युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहण्यासच सांगितले नाही तर भारताला प्रत्युत्तराची धमकीही दिली आहे . या पार्श्वभूमीवर भारतामध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला असून नौदलानेही कंबर कसली आहे. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले तेंव्हा जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. लष्कराच्या मनातही असंतोष खदखदत होताच. पण, घाईघाईत कुठलंही चुकीचं पाऊल न उचलता, अत्यंत थंड डोक्याने दिवस-रात्र एक करून तिन्ही दलांनी एकत्रितपणे आखणी केली आणि आज भारताला मोठं यश मिळालं. मिराज 2000 या विमानांमधून १००० किलोचे बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर टाकण्यात आले आणि मसूद अझरचा भाऊ, मेव्हण्यासह ३०० दहशतवादी मातीत गाडले गेले असल्याचे वृत्त आहे . पाकिस्तानने वारंवार आश्वासन देऊनही जैशचा बंदोबस्त न केल्यानं आणि त्यांच्याकडून आणखी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यामुळेच हा हल्ला केल्याचे परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले आहे . भारताच्या हवाई हल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची वेळ आणि ठिकाण ठरवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे. शिवाय पाकिस्तानचे दहशतवाद्यांचे स्लीपर सेलही घातपात घडविण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.