मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना देशहित शिकवू नये , नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत, त्यांनी आम्हाला देशहित शिकवू नये, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करत ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत गैरसमज निर्माण करत आहेत.
देशहित काय ते शरद पवारांना कळते. शरद पवार म्हणाले होते की पाकिस्तानमधले राज्यकर्ते, तेथील सैन्यदल त्यांच्या हितासाठी भारताविरोधात वातावरण निर्माण करतात आणि राजकीय हित साधण्यासाठी बेताल वक्तव्य करतात. याउलट आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अध्यक्ष असताना जेव्हा ते पाकिस्तानला गेले तेव्हा त्यांना असा अनुभव आला की पाकिस्तानची जनता मात्र भारतीय जनतेशी वैर भावनेनं वागत नाही.’