मोठ्या व्यवहारांसाठी ‘आधार’ केवायसी अनिवार्य करणार

बँक खात्यात दरवर्षी एका निश्चित रकमेपेक्षा अधिक पैसे जमा केल्यास किंवा काढायचे असल्यास त्यासाठी केवळ पॅन कार्डची माहिती देणे आता पुरेसे नाही. बाजारातील ‘गंगाजळी’चा मोठा प्रवाह थोपवण्यासाठी सरकार एक मोठं पाऊल उचलणार आहे. एका निश्चित रकमेपेक्षा अधिकच्या रोखीच्या व्यवहारांसाठी ‘आधार’ प्रमाणित करणं बंधनकारक करण्याची योजना आणण्याचा सरकारचा विचार आहे. बायोमेट्रिक टूल किंवा वन टाइम पासवर्डचा वापर करून आधार कार्ड केवायसी करता येणं शक्य होणार आहे.
वित्त विधेयकातील प्रस्तावित तरतुदीनुसार, मोठ्या रोखीच्या व्यवहारांसाठी, तसेच प्रमाणापेक्षा अधिक विदेशी चलन खरेदी केल्यास याआधी पॅनकार्डची माहिती देणं पुरेसं होतं. पण आता यासाठी आधार प्रमाणित करणं अनिवार्य केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निश्चित मूल्याच्या मालमत्तेच्या व्यवहारावेळी केवळ आधार-पॅन कार्डाची माहिती देणं पुरेसं नाही तर, त्यासोबत मालमत्तेचं रजिस्ट्रेशन करताना आधार प्रमाणित करणं अनिवार्य केले जाणार आहे.
सरकारी सूत्रांनुसार, लहान रोखीचे व्यवहार बिनदिक्कत व्हावेत आणि निश्चित रकमेपेक्षा अधिकच्या रोखीच्या व्यवहारांवर करडी नजर ठेवता यावी हे पाऊल उचलले जाणार आहे. बायोमेट्रिक टूल्स किंवा ओटीपीचा वापर करून आधार प्रमाणित करणे बंधनकारक केल्यास १० ते २५ लाखांपर्यंतच्या ठेवी किंवा व्यवहारांवर लक्ष ठेवता येणार आहे.