IndiaWorldNewsUpdate : इस्रायल-इराण संघर्षावर भारताच्या भूमिकेबाबत सोनिया गांधींची टिप्पणी, अजूनही उशीर झाला नाही….

नवी दिल्ली : माजी काँग्रेस अध्यक्षा व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी इस्रायल-इराण युद्धाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्यांनी पश्चिम आशियातील विद्यमान स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “गाझा व इराणमधील विध्वंसावर नवी दिल्लीने शांत बसणं हे म्हणजे आपण आपल्या मूल्यांचा त्याग करणं आहे”.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘भारताचा आवाज ऐकायला अजूनही उशीर झालेला नाही’ या शीर्षकासह एक लेख लिहिला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की “इस्रायलसह स्वतंत्र पॅलेस्टाइनची कल्पना करणाऱ्या शांततापूर्ण द्वीपक्षीय तोडग्याचं भारताने प्रदीर्घ काळापासून समर्थन केलं आहे. मात्र, नवी दिल्लीने आपल्या तत्वनिष्ठ वचनबद्धतेचा त्याग केल्याचं दिसतंय”.
सोनिया गांधी यांनी दी हिंदूमध्ये लिहिलेल्या लेखात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली आहे. ट्रम्प यांनी विध्वसंक मार्ग निवडल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, “गाझामधील विध्वंस व इराणमध्ये विनाकारण होत असलेले हल्ले पाहूनही नवी दिल्लीने त्यावर मौन बाळगणं म्हणजे आपल्या नैतिक व राजनैतिक परंपरांचा त्याग करत आपली मूल्ये सोडली आहेत असं दिसतंय. मात्र, अजूनही उशीर झालेला नाही. भारताने यावर स्पष्ट बोललं पाहिजे, जबाबदारीने वागलं पाहिजे आणि पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी, संवादाला सुरुवात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक राजनैतिक मार्गाचा वापर केला पाहिजे”.
सरकार आपल्या मूल्यांपासून विचलित झाले आहे…
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे की “या मानवनिर्मित आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने भूमिका घेताना भारताची दीर्घकालीन तत्वनिष्ठ वचनबद्धता जवळजवळ सोडून दिली आहे. भारताने नेहमीच परस्पर सुरक्षितता व सन्मानाने इस्रायलच्या शेजारी राहणाऱ्या सार्वभौम, स्वतंत्र पॅलेस्टाइनची कल्पना केली आहे. मात्र, आपलं विद्यमान सरकार यापासून विचलित झाल्याचं दिसतंय”.
इस्रायलच्या हल्ल्यांमुळे संघर्षाची बीजे पेरली जातील…
सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे की “इस्रायलने १३ जून रोजी इराणवर हल्ला केला, त्याचे मध्य-पूर्वेत तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. इस्रायलने इराणच्या भूमीवर केलेले हल्ले व बॉम्बस्फोटांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निषेध केला आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारचं मौन खटकतंय. तसेच इस्रायलच्या गाझामधील क्रूर कारवायांमुळे तिथलं नागरी जीवन उद्ध्वस्त झालं आहे. यामुळे अस्थिरता आणखी वाढेल आणि संघर्षाची बीजे पेरली जातील”.
“इस्रायल नेतृत्वाचा शांतता बिघडवण्याचा इतिहास”
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यावरही टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायल नेतृत्वाचा शांतता बिघडवण्याचा आणि अतिरेकीवादाला प्रोत्साहन देण्याचा मोठा व दुर्दैवी इतिहास आहे. ते संवादापेक्षा वाद चिघळवणं पसंत करतात, आताही ते तेच करतील आणि त्याचं कोणालाही आश्चर्य वाटणार नाही”.