MahaVikasAghadiNewsUpdate : अशा कोणत्या जागा आहेत जिथे शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात एकमत होत नाही …..

मुंबई : महायुती असो की महाविकास आघाडी दोन्हींकडेही जागा वाटपाचे घोळ विधानसभेची निवडणूक जाहीर झाली तरी मिटायला तयार नाहीत. दरम्यान महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण, महाविकास आघाडीमध्ये विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याने वाद वाढताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे विदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला चार जागा हव्या असून, त्या देण्यास काँग्रेसने नकार दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर १२ जागा मागणाऱ्या समाजवादी पक्षाला किती आणखी कोणत्या जागा सोडायच्या हा प्रश्नही अद्याप मिटलेला नाही.
विषय असा आहे की ,महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी १२ जागांवर दावा केला आहे.मात्र त्यांना नेमक्या कोणत्या जागा मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यावरून महाविकास आघाडीत वाद अधिक वाढत चालला आहे. सूत्राच्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये २५० पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर २८ जागांवरून पेच निर्माण झाला आहे. या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मुंबईतील तीन जागांचा तिढा आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. तर वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईतीलच भायखळा, मानखुर्द शिवाजीनगर वर्सोवा आणि अणुशक्ती नगर या जागांवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. यात महत्त्वाचा पेच म्हणजे यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित केली असल्याचे समजते.
याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत विदर्भातील रामटेक, अमरावतीसह काही जागा काँग्रेससाठी सोडल्या. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विदर्भातील काही जागांवर दावा केला जात आहे. त्या जागा सोडण्यास काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नसल्याने आता हा मुद्दा दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे जाण्याची शक्यता आहे.