IndiaNewsUpdate : अरविंद केजरीवालांना कोर्टाचा दिलासा नाहीच, उद्या ईडीसमोर हजर राहावे लागणार…

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने वारंवार समन्स जारी करूनही केजरीवाल हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे ईडीने थेट न्यायालयात धाव घेतली. ईडीने दाखल केलेल्या दुसऱ्या तक्रारीनंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या दंडाधिकारी न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना १६ मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले होते. दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेल्या या आदेशालाही केजरीवाल यांच्याकडून आव्हान देण्यात आले होते मात्र अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जारी करण्यात आलेल्या समन्सला स्थगिती देण्यास राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या सत्र न्यायालयानेही नकार दिल्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे
याप्रकरणी ईडीचा आरोप आहे की, आप नेत्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये लागू झालेल्या उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ शी संबंधित एकूण १०० कोटी रुपयांची लाच घेतली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांच्या शिफारशीनंतर हे धोरण रद्द करण्यात आले आणि कथित अनियमिततेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो चौकशी सुरू करण्यात आली. आपल्या सहा आरोपपत्रांपैकी एका आरोपपत्रात ईडीने दावा केला आहे की, मद्य धोरण अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यामुळे चौकशीसाठी केजरीवाल यांना वारंवार समन्स जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, राजकीय उद्देशाने माझ्याविरुद्ध ही कारवाई केली जात असून मी इंडिया आघाडीपासून वेगळे व्हावे, असा सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्न आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र आता न्यायालयानेही दिलासा न दिल्याने केजरीवाल यांना हजर राहावे लागणार आहे. याच प्रकरणात ईडीने केसीआर यांच्या कन्या के कविता यांना आज अटक करून हैद्राबादवरून दिल्लीला नेले आहे.