INDIA Alliance Meeting : उद्या दिल्लीत होणारी इंडिया आघाडीची बैठक या कारणामुळे झाली रद्द , औपचारिक बैठाक मात्र होणार …

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला महत्व आले होते परंतु मिचाँग चक्रीवादळामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. मात्र एक अनौपचारिक बैठक होणार असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे तर आघाडीची मुख्य बैठक १८ किंवा १९ डिसेंबर रोजी होईल असे सांगितले जात आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत इंडिया अलायन्सची बैठक होणार होती. या बैठकीत विरोधी पक्षांचे बडे नेते सहभागी होणार होते. मात्र आता अनेक नेते उपस्थित राहू शकत नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याचे वृत्त आहे. ममता बँनर्जी , नितीश कुमार, तामिळनाडूचे स्टॅलिनही या बैठकीला अनुपस्थितीत राहणार नसल्याची माहिती समोर आली होती.
इंडिया आघाडीतील घटक पक्ष नाराज
वास्तविक, पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला झाला. तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या हिंदी बेल्ट असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव स्वीकारावा लागला आहे. या सर्व राज्यात आघाडी एकत्र लढली असती तर चित्र वेगळे दिसले असते अशी आघाडीतील काही नेत्यांची भावना आहे..
दरम्यान या निवडणुकीत इंडिया आघातील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतले नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज असल्याचे सांगीतले जात आहेत. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मिचॉंग चक्रीवादळामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असे कळवल्याचे काँग्रेसने सांगितले. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीस तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र ममता बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचे कारण स्पष्ट केले आहे. उत्तरेकडील भागात आधीच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी ममता बॅनर्जींना उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल त्यांना आधी माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे याकाळात त्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.