SharadPawarNewsUpdate : अजित पवार भाजापासोबत का गेले ? याचा अखेर शरद पवारांनीच केला गौप्यस्फोट , अदानी यांच्या मैत्रीवरही केला खुलासा …
मुंबई : अजित पवार हे विरोधी पक्षनेते असतानाही भाजपसोबत का गेले?, अखेर या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिले आहे. तपास यंत्रणांच्या भीतीमुळे अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. जेंव्हा की , शिवसेनेच्या बण्डखोर आमदारांप्रमाणे विकासासाठी आम्ही भाजपसोबत गेल्याचा दावा अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे ८ मंत्री सातत्याने करीत होते.
राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नेतृत्व सोडून अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच या सगळ्या घडामोडींमागे शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा सातत्याने केली जात होती परंतु यावर शरद पवार यांनी आतापर्यंत कुठलेही भाष्या केले नव्हाते. यावर आता खुद्द शरद पवार यांनीच मोठा खुलासा केला आहे.अजित पवार यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी दिली नाही, असं शरद पवार म्हणालेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मोठा खुलासा केला आहे.
दरम्यान अजित पवार यांनी भाजसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा नेमकं काय घडलं याची माहिती देताना शरद पवार म्हणाले की , माझ्याकडे ६ ते ७ सहकारी आले. सरकारला पाठिंबा न दिल्यास जेलमध्ये जावं लागेल. आमच्यासमोर सध्या दोनच पर्याय आहेत. एकतर भाजपसोबत जाणं किंवा जेलमध्ये जाणं, त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा पर्याय स्वीकारला.
पवार पुढे म्हणाले की , भाजपसोबत गेले ते माझ्या पक्षाचे असू शकत नाहीत. भाजपकडून सातत्याने विरोधी पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपने आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सोबत घेतले. दरम्यान राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्याचा कौटुंबीक संबंधावर कोणताही परिणाम झाला नाही. आमचे खासगी आणि व्यावसायिक संबंध वेगवेगळे आहेत, असेही ते म्हणाले.
अडाणी यांच्या मैत्रीबद्दल खुलासा
काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करत आहेत. संसद असो की संसदेच्या बाहेर राहुल गांधी हे अदानींविरोधात सातत्याने बोलत असतात. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सातत्याने गौतम अदानी यांना भेटत असतात. त्यामुळे अदानी यांच्यावरून इंडिया आघाडीतच मतभेद असल्याचं उघड झालं आहे. शरद पवार हे गौतम अदानी यांची बाजू का घेतात असा प्रश्नही सातत्याने विचारला जात आहे. त्यावर शरद पवार यांनीच खुलासा केला आहे.
देशाच्या विकासाचा मुद्दा येतो तेंव्हा अदानींचे समर्थन
अदानींबाबत मतं मांडण्यासाठी राहुल गांधी स्वतंत्र आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. पण जेव्हा देशाच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा मी अदानी यांचंच समर्थन करेन, असं शरद पवार यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अदानी यांना उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार येईल…
भाजपला देशातील वातावरण अनुकूल नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी त्यांनी मे महिन्यात कर्नाटकात झालेल्या निवडणुकीचा संदर्भ दिला. राज्यांमध्ये भाजपला अनुकूल वातावरण नाहीये. महाराष्ट्राचा विचार कराल तर आता निवडणुका झाल्यास राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार येईल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
ईडीकडून सूड भावनेतून कारवाई
आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या कारवाईमुळे आप आणि काँग्रेस अधिक जवळ येईल, असं त्यांनी सांगितलं. संजय सिंह यांच्यावरील कारवाई ही सूडभावनेतून करण्यात आली आहे. जे नेते सरकारच्या इशाऱ्यावर चालत नाहीत, त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.