JharkhanDNewsUpdate : अखेर हेमंत सोरेन सरकारने बहुमत सिद्ध करून दाखवले …

रांची : हेमंत सोरेन सरकारने आज झारखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव संमत झाला आहे. हेमंत सोरेन सरकारला 81 पैकी 48 मते मिळाली. मतदानाच्या वेळी विरोधकांनी सभात्याग केला. हेमंत सोरेन यांनी विधानसभेला संबोधित करताना विरोधी पक्ष भाजपवर निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवून देशात “गृहयुद्धासारखी परिस्थिती” निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच सरकार पाडण्यासाठी झारखंडच्या आमदारांना विकत घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोरेन यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनापूर्वी भाजपला आव्हान देत , आमच्यासाठी जो सापळा रचला आहे, त्याच सापळ्यात भाजपला फेकून देऊ, असे म्हटले होते. सोरेन आणि त्यांचा पक्ष जेएमएमने संकटाचा फायदा घेऊन निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपवर केला आहे.
भाजपची राजीनाम्याची मागणी
दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपचे म्हणणे आहे की , हेमंत सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवावे. त्यांनी स्वत:ला खाणपट्टा देऊन निवडणूक नियमांचे उल्लंघन केले आहे. या आधारावर मुख्यमंत्र्यांनी “नैतिक आधारावर” राजीनामा देण्याची आणि निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे झारखंडमधील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने (भाजप) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात निवडणूक आयोगात लाभाच्या पदाच्या प्रकरणी याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाने २५ ऑगस्ट रोजी राज्यपाल रमेश बैस यांना आपला निर्णय पाठवला आहे. राज्यपाल रमेश बैस याबाबत कधीही निर्णय देऊ शकतात.
81 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 49 आमदार आहेत. सर्वात मोठा पक्ष जेएमएमकडे 30 आमदार आहेत, काँग्रेसचे 18 आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे (आरजेडी) एक आमदार आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपचे 26 आमदार आहेत. बहुमताचा आकडा 41 आहे.