IndiaNewsUpdate : देशात फुटीरतावादी अजेंडा राबवणाऱ्या पीएफआय सारख्या संघटनेवर बंदीची मागणी

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज धार्मिक प्रमुखांची बैठक घेतली. अखिल भारतीय सुफी सज्जनशिन परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे, या कार्यक्रमादरम्यान डोवाल यांनी देशाला धर्म आणि विचारसरणीच्या नावाखाली सलोखा बिघडवण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा कट रचणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी डोवाल म्हणाले, “काही घटक असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जे भारताच्या प्रगतीत अडथळा आणत आहेत. ते धर्म आणि विचारसरणीच्या नावाखाली कटुता आणि संघर्ष निर्माण करत आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होत आहे. देशाबाहेरही ते पसरत आहे. ”
दरम्यान आयोजकांनी एका निवेदनात म्हटले आहे, “… विविधतेतील एकतेचे चमकदार उदाहरण म्हणून भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही समाजकंटक आणि गटांमुळे देश कठीण काळातून जात आहे.”
प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बैठकीच्या आठ कलमी ठरावांपैकी एका ठरावात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया किंवा पीएफआयवर बंदी घालण्याचे म्हटले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाल्याने हा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे.
या ठरावात म्हटले आहे की, “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि इतर तत्सम संघटना, जे देशविरोधी कारवाया करत आहेत, फुटीरतावादी अजेंडा राबवत आहेत आणि आपल्या नागरिकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत, त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी आणि त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच आम्ही जोरदार शिफारस करतो की कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही माध्यमातून समुदायांमध्ये द्वेष पसरवण्यास दोषी आढळल्यास, कायद्याच्या तरतुदींनुसार कारवाई केली जावी.