MaharashtraPoliticalUpdate : शिंदे -फडणवीस सरकारने अखेर नामांतराचा प्रश्न निकाली काढला …

मुंबई : ठाकरे सरकारने केलेले नामांतराचे तिन्हीही ठराव काल शिंदे -फडणवीस सरकारने स्थगित केले होते. दरम्यान या विषयावरून सुरु झालेली चर्चा थांबत नाही तोच आज याच सरकारने औरंगाबादचे नामांतर केवळ संभाजी नगर नव्हे तर त्याला जोडून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचे नामकरण दि. बा. पाटील विमानतळ असे करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
‘सह्याद्री’वर झालेल्या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयांची मागिती देण्यात आली आहे. “आज मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकणारे निर्णय नाहीत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने सरकारने जबाबदारी स्वीकारून घेतलेले निर्णय आहेत. या निर्णयांचा नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
“अल्पमतातल्या सरकारने घाईत निर्णय घेतले होते”
दरम्यान, नामांतराबाबत नव्या सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच्या ठाकरे सरकारवर टीका केली. “२९ जूनला अल्पमतातल्या सरकारने काही निर्णय घाई-गडबडीने घेतले. पुढे त्यावर कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये, म्हणून हे प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश आम्ही दिले होते”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
केंद्राकडे ठराव पाठवून मंजूर करून घेऊ : फडणवीस
“यासंदर्भातला ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्राकडे मान्यतेसाठी आम्ही पाठवू. त्याचा पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
MMRDA ला ६० कोटींच्या कर्जउभारणीसाठी मंजुरी
एमएमआरडीए मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवते आहे. शिवडी-न्हावाशेवा हा देखील मोठा प्रकल्प आहे. असे प्रकल्प राबवताना त्यांनी ६० हजार कोटींचं कर्ज उभारण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटींसाठी शासन हमी देखील देण्यात आली आहे. जेणेकरून प्रकल्पांना निधी कमी पडणार नाही, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.