MumbaiNewsUpdate : आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाईचे बाल हक्क आयोगाचे आदेश

मुंबई : संभावित मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे न करता ‘आरे’ येथेच उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मुंबईतील पर्यावरण प्रेमी मंडळींनी ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र केले आहे. या मागणीसाठी दर रविवारी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण प्रेमींनी केली आहे. या आंदोलनात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी नव्या सरकारवर टीका केली होती. या आंदोलनात अनेक अल्पवयीन मुलांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान याच मुद्यावरून आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावली असून तीन दिवसांत पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई पोलिसांना राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेमधील अल्पवयीन मुलांचा वापर ‘आरे वाचवा’ आंदोलनासाठी केला आहे. याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधितांनी हातात पोस्टर घेऊन आंदोलन करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामुळे संबंधित आरोपीविरोधात तत्काळ एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची विनंती, आयोगाकडून करण्यात आली आहे.”
दम्यान हे पत्र मिळाल्यानंतर तीन दिवसात कारवाई करून संबंधित अहवाल आयोगाकडे पाठवावा, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे. आमचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या विकासासाठी हे सर्व प्रकल्प आहेत. कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी योग्य आहे. येथे एकाच ठिकाणी चार कारशेड निर्माण करता येतील. त्यामुळे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असे आदित्य ठाकरे संबंधित आंदोलनात म्हटले होते. यावरून मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे.