AurangabadNewsUpdate : हृदयद्रावक : विजेच्या धक्क्याने चार कंत्राटी कामगारांचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात विद्युत तारांचा शॉक लागून चार जणांचा मृत्यू झालाय. कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नावडी गावात इलेक्ट्रिकचे काम सुरू असताना ही घटना घडलीय. गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे आणि राजू मगर, अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सर्व मृत कामगार महावितरणकडे कॉन्ट्रॅक्टवर काम करत होते. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली आहे.
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नांदगीर वाडी येथे नवीन विद्युत प्रवाहाच्या तारा ओढण्याचे काम सुरू होते. काम सुरू असतनाच अचानक विद्युत तारेत प्रवाह सुरू झाल्याने कन्नड तालुक्यातील नावडी येथील चार तरुणांचा मृत्यू झाला.
हिवरखेडा नांदगीर वाडी या शिवारात मृत चार जण नवीन विद्युत प्रवाहाचे काम करत होते. विद्युत पोल उभे केले होते. त्या पोलवर नवीन तारा ओढण्याचे काम चालू होते. ज्या ठिकाणी हे तारा ओढण्याचे काम सुरू होते तिथे विद्युत प्रवाह नव्हता. मात्र काम सुरू असलेल्या 300 फूट अंतरावरुन एका शेतकऱ्याने केबल वायर टाकून लाईट नेली होती. तारा ओढत असताना ती तार नेमकी त्या केबलवर पडली. तार ओढत असताना ती वायरला चिटकली आणि विद्युत प्रवाह त्या तारेत उतरला. त्यामुळे चारही कामगारांना जोराचा शॉक लागला. या घटनेत चारही कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चारही मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. निपचीत पडलेले मृतदेह पाहून मृतांच्या नातेवाईकांनी एकच हांबरडा फोडला होता. दरम्यान, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास सुरू आहे.