MumbaiNewsUpdate : महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन आणि विधिवत पूजा करून मुख्यमंत्री मंत्रालयात , पूजेवरून टीका
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना अभिवादन करीत आपल्या दालनात धार्मिक विधिवत सत्यनारायणाची पूजा करीत राज्य सचिवालय मंत्रालयात अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या दालनात त्यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचा मोठा फोटो आणि त्याच्या शेजारी शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांचा फोटो लावला आहे. यानिमित्ताने शिंदे गट हीच बाळासाहेबांची शिवसेना हे ठासवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे ही कोणाचीही मालमत्ता नाही. बाळासाहेब संपूर्ण राज्याचे आहेत आणि कोणीही ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही.
सत्यनारायणाच्या पूजेला आक्षेप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आपला पदभार स्विकारला. हा पदभार स्वीकारण्याच्या अगोदर मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा घातली होती. ही ‘सत्यनारायण पुजा’ घातल्याबद्दल आता मानवी हक्क कार्यकर्ते विकास शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहंले असून या पत्राद्वारे त्यांनी या मंत्रालयातील धार्मिक विधी बाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. तसेच राष्ट्रवादी लोन्ग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने देखील या विधीचा निषेध केला आहे.
राज्यपालांना दिलेल्या पत्रात शिंदे यांनी म्हटले आहे कि , ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वाची पायमल्ली करत मुख्यमंत्री कार्यालयात ‘सत्यनारायण पुजा’ आणि धार्मिक विधी करण्यात आला आहे. मात्र, एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या सरकारने दि. ४ जानेवारी २०१७ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार कोणत्याही सरकारी, निमसरकारी कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करता येणार नाहीत. देवी देवतांचे फोटो लावता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. हे परिपत्रक भारतीय संविधानाच्या ‘धर्मनिरपेक्षतेच्या मुलभूत तत्वाला अनुसरून काढण्यात आले आहे.
शासकीय पत्रकात काय म्हटले आहे ?
शासकीय परिपत्रकानुसार संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वानुसार भारतातील सरकार किंवा सरकारी कार्यालयांमध्ये कोणत्याही धर्माचे आचरण करता येत नाही. त्यानुसार कोणत्याही सरकारी कार्यालयात कसल्याही प्रकारची देवपूजा, धार्मिक विधी, सत्यनारायण, देवांचे फोटो लावणे, नमाज पडणे आदी कृती असंवैधानिक व बेकायदेशीर समजण्यात येतात. वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला, मात्र कोणत्याही भिन्न धर्माच्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होवू नये, यासाठी सरकारी यंत्रणा धर्मनिरपेक्ष असतील याची काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान संविधानातील तरतुदीची जपणूक करण्याची जबाबदारी सरकारच्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीवर आहे. मात्र अशाप्रकारे जबाबदार व्यक्तीच संविधाची तत्वे पाळत नसतील तर अशा वेळी त्यांना त्यांच्या संवैधानिक जबाबदारीची जाण करून देणे गरजेचे आहे. जर कुंपणच शेत खात असेल तर, पिक चांगलं येईल ही अपेक्षा ठेवणे भाबडेपणा आहे. संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वालाच काळिमा फासण्याचे काम जर मुख्यमंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून होत असेल तर धर्मनिरपेक्षपणाची भावना ठेवणे खुळेपणाच ठरतो असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
राष्ट्रवादीकडूनही जाहीर निषेध
दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या या कृतीचा राष्ट्रवादीचे आमदार अमोर मिटकरी यांनी देखील निषेध नोंदवला आहे. मिटकरी यांनी म्हटले आहे कि , मुख्यमंत्र्यांनी केलेली पूजा घटनाविरोधी आहे. मुख्यमंत्री कार्यालयात विधी करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे. मुख्यमंत्री धार्मिक आहेत याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यात वाद नाही. मात्र, धर्म घरापर्यंत ठिक आहे. तो संविधानिक ठिकाणी नको आहे. लोकशाही खरोखर जिवंत आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून आपण या घटनेचा निषेध करत असून तसेच करण्यात आलेली धार्मिक पूजा संविधानाच्या घटनाबाह्य आहे. असेही ते म्हणाले.
संभाजी ब्रिगेडकडूनही मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध
मुख्यमंत्री कार्यालयात पूजा-अर्चा करणे हे अनाकलनीय आहे. सरकार हे धर्मनिरपेक्ष असावे, धर्मांध असणे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील कृतीने भारतीय राज्यघटनेचा अपमान झाला आहे तसेच सरकारी अध्यादेशाला सुद्धा हरताळ फासण्याचे काम केलं आहे. शासकीय नियम शासकीय कार्यालयात पूजा अर्चा करण्यास बंदी आहे, हे एकनाथ शिंदे झटक्यात विसरले. असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिली आहे.
आ. केसरकर यांच्याकडून समर्थन
दरम्यान शिंदे गटातल्या आमदारांची बाजू पहिल्या दिवसापासून मांडणाऱ्या दीपक केसरकर यांनीही यावर भूमिका मांडली आहे. ज्या क्षणी शपथ घेतली त्याच दिवसापासून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. पण भारतीय परंपरेप्रमाणे त्यांनी पुजा करून कार्यालयात प्रवेश केला अशा शब्दात केसरकर यांनी पूजेचे समर्थन केले ते पुढे म्हणाले कि , २०१४ मध्ये, त्यांनी मला सांगितले होते की ते मला कॅबिनेट मंत्री बनवू शकत नाहीत कारण त्यांना बाळासाहेबांसोबत काम केलेल्या सेनेच्या नेत्यांना प्रथम प्राधान्य द्यायचे होते. त्यामुळे मी उद्धवजींचा आदर करतो. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भावना गवळी यांची लोकसभेत पक्षाच्या प्रतोद पदावरून कमी केल्याच्या निर्णयावर टीका करताना केसरकर ,हणाले कि , अशा कृतीने तुम्ही महिलांचा अपमान करत आहात. त्या पाच वेळा खासदार आहेत, ज्यांनी शिवसेनेचा झेंडा उंचावला आहे,त्यांच्यावर हा अन्याय आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बुधवारी गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची लोकसभेतील प्रतोद म्हणून नियुक्ती केली.