Maharashtra Weather Update : राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता , मराठवाड्यात यलो अलर्ट

मुंबई : केरळमध्ये तीन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला होता. दरम्यान गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर काही दिवस मान्सूनचा खोळंबा झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनने आगमन केले असले तरी अजूनही विदर्भातील काही भागात मान्सून दाखल झाला नाही. पण आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकणात सोमवारपासून अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाणे आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
18 Jun,आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून,काही ठिकाणी मध्यम ते जोरधार पावसाची शक्यता तसेच म.महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भातही
द.कोकणात सोमवार पासून अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाण्यासह उ.कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Latest Satellite obs confirms status now pic.twitter.com/jqjgKYsiq0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 18, 2022
दरम्यान हवामान खात्याने आज गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट (पिवळा इशारा) जारी केला आहे. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे
दुसरीकडे, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत. विदर्भातील गडचिरोली वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे. पुढील पाच दिवस कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती राहणार असून आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे