MonsonNewsUpdate : Good News : जातोय उन्हाळा , येतोय पावसाळा , मान्सून आला रे आला … !!

मुंबई : उन्हाळ्यामुळे लाही लाही झालेल्या देशवासियांना दिलासा देणारी बातमी आहे . हि बातमी म्हणजे देशाला प्रतीक्षा असणारा मान्सून सहा दिवस आधीच अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मॉन्सून अंदमानच्या समुद्रात आज दाखल झाला आहे. विशेष म्हणजे सहा दिवस आधीच आज 16 मे रोजी मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तर केरळ आणि लक्षद्वीपमध्ये १८ मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १६ ते १९ मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान पश्चिम बंगाल आणि ईशान्यकडील ७ राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती देखील हवामान तज्ञांनी दिली आहे. पावसासाठी अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.