MumbaiNewsUpdate : ‘सिल्वर ओक’ बंगला आंदोलन : चौकशीनंतर पोलिसांकडून गुणरत्न सदावर्ते यांना अटक , आज न्यायालयासमोर हजर करणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’ बंगल्यावर केलेल्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी याच प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर त्यांना अटक केली आहे. जमावाला भडकवणे, कट रचणे या गुन्ह्या अंतर्गत भादंवि कलम ३५३ आणि १२० बी अन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1512467804620210176
दरम्यान मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या जीवाला धोका असून माझी हत्या होऊ शकते असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी देखील आरोप केले आहेत. ”आमच्या कुटुंबाला धोका आहे. गुणरत्न सदावर्ते यांना जर काही झालं तर त्याला शरद पवार जबाबदार असतील. गुणरत्न सदावर्तेना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांचं वर्तन योग्य नव्हतं.” असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचा पवारांना फोन
या सर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्यासंदर्भात चर्चा केली. तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सुरक्षितते संदर्भातही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्याची गंभीर दखल घेतली आहे. त्या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी फोनवरून चर्चा केलीय.
शरद पवार यांची प्रतिक्रिया
या सर्व प्रकाणावर आपली प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांना आधार देणं गरजेचे आहे. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा मार्ग चुकत असेल तर त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. राजकारणात संघर्ष असतात पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता ते शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी आणि माझा घनिष्ठ संबंध आहे. गेल्या ५० वर्षांपासून हे नाते आहे. त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून सुटले नाही. संकट आलं तर आपण सर्व एकत्र आहोत हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल तुमचे आभार असेही शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. नेता चुकीचा असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आज दिसले असेही शरद पवार म्हणाले.