MaharashtraNewsUpdate : अनिल देशमुख ‘ईडी’कडून आता ‘सीबीआय’च्या ताब्यात

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुखला ताब्यात घेतले आहे. सीबीआयचे पथक त्यांना रिमांडसाठी विशेष सीबीआय न्यायालयात हजर करणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्या वर्षी 21 एप्रिल रोजी देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध चौकशी सुरू केली होती.
अनिल देशमुख यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयला ताब्यात घेण्याच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या परवानगीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. देशमुख यांनी सोमवारी अधिवक्ता अनिकेत निकम यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयच्या कोठडीच्या याचिकेलाही आव्हान दिले होते.
विशेष सीबीआय न्यायालयाने 31 मार्च रोजी सीबीआयने दाखल केलेल्या अर्जाला परवानगी दिली होती आणि एजन्सीला देशमुख आणि संजीव पालांडे, कुंदन शिंदे (देशमुख यांचे माजी सहकारी) आणि बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाजे या तिघांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली होती.