PoliticalNewsUpdate : असे काय म्हणाले देवेंद्र फडणवीस कि , ज्याची चर्चा सुरु झाली !!

मुंबई : मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटत असल्याचे उदगार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. फडणवीस यांच्या हस्ते बेलापुरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , “गणेश नाईक असतील, भाजपा आमदार मंदा म्हात्रे असतील किंवा पाटील साहेब असतील यामुळे मला एकही दिवस जाणवले नाही मी मुख्यमंत्री नाही. मला असे वाटते मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचे नाही तो काय करतो हे महत्वाचे आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिले नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे”.
नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला
दरम्यान त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता नवाब मलिकांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे. मी मुख्यमंत्री नाही असे मला वाटतच नाही, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तितकेच मोठे आहे, असा चिमटा नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना काढला आहे.
यावेळी बोलताना नवाब मलिक पुढे म्हणाले कि , “दोन वर्ष फिरत असताना मला असे वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असे मला वाटते असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटते दोन वर्ष होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केले पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढले पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठे आहे. ते पद मुख्यमंत्रिपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळले पाहिजे”.