UttarPradeshNewsUpdate : लखीमपूर प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्राला दिलासा नाही

लखीमपूर : उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेले विशेष तपास पथक आता सखोल चौकशी करणार आहे.
आशिष मिश्राला एसआयटीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे न्यायालयासमोर सादर करण्यात आले . अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आशिष मिश्राच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. वकील एसपी यादव यांनी सांगितले की, आशिष मिश्राच्या तीन दिवसांच्या कोठडीसंदर्भात काही अटीही घालून देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी अर्ज दिला होता. सुनावणीमध्ये काही वेळासाठी व्यत्ययही आला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू असल्याने व्यत्यय आल्याची माहिती आजतकने दिली आहे. पोलिसांनी कोर्टात सांगितले की, आशिष मिश्राची फक्त १२ तास चौकशी होऊ शकली, ज्यात त्याने उत्तरे दिली नाहीत. म्हणून त्याला १४ दिवसांच्या कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. मात्र आता कोर्टाने १४ दिवसांऐवजी तीनच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
दरम्यान आशिषच्या वकिलांनी सांगितले की, पोलिसांकडे आशिषला विचारण्यासारखे फक्त ४० प्रश्न होते, ते त्यांनी विचारले. १२ तासांच्या चौकशीदरम्यान फक्त एकदा पाणी प्यायला दिले आणि न थांबता सातत्याने चौकशी सुरू होती, प्रश्न विचारले जात होते, उत्तरे दिली जात होती.