UttarPradesHnewsUpdate : लखीमपूर खिरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल , आज सुनावणी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमधील हिंसाचारात झालेल्या ४ शेतकऱ्यांसह ८ जणांच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाने स्वत: दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ आज प्रकरणी सुनावणी करणार आहे. या खटल्याला ‘व्हायलन्स इन लखीमपूर खिरी लीडिंग टू लॉस ऑफ लाइफ, असे नाव दिले गेले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हे या खंडपीठाचे सदस्य आहेत.
रविवारी लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तिकोनिया भागातझालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अजय मिश्रा यांच्या मूळ गावात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.
मंत्र्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनीही आंदोलन सुरू केले. शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. यामुळे हिंसाचार भडकला, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलीस तपास करत आहेत. पोलीस आरोपींना अटक न करता त्यांचे संरक्षण करत आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.