MaharashtraNewsUpdate : अनिल देशमुख यांच्या कथित वसुली प्रकरणात ईडीकडून आज गृह उपसचिवाचीही चौकशी

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून अनिल देशमुख यांची चौकशी चालू असतानाच आता राज्याच्या गृहविभागाचे उप सचिव कैलाश गायकवाड यांनाही ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी आजच ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’नेही देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान ‘ईडी’कडून त्यांना आत्तापर्यंत पाच वेळा चौकशीचे समन्स बजावले गेले आहेत. मात्र, देशमुख अद्यापही हजर झालेले नाहीत. त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे.
दरम्यान अनिल देशमुख यांच्या शोधासाठी ‘ईडी’नं आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ‘ईडी’ची तीन पथके एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. लूकआऊटमुळे लवकरच परराज्यात देखील ‘ईडी’कडून शोध सुरू होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख ईडीसमोर आले नसले तरी त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी ईडीने सुरू केली आहे. देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी झाली आहे. आता ईडीनं कैलाश गायकवाड यांना चौकशीसाठी बोलावले आहे.