CoronaMaharashtraUpdate : खा . संभाजी राजे यांनी सरकारला सुनावले खडे बोल

मुंबई : “राज्य सरकारने पाठवलेले पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवले. फक्त पाठवायचे म्हणून हे लेखी उत्तर पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतली नाही”, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी आपला संताप व्यक्त केला. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
संभाजीराजे यांनी नांदेडमध्ये घेतलेल्या सभेला उपस्थित असणाऱ्या मराठा समाजाच्या तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे संभाजी राजे चांगलेच संतापले आहेत. या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न त्यावेळी संभाजीराजे यांनी केल्याचे दृश्यांमध्ये दिसून आले होते. त्याचा संदर्भ घेत संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. “आवाज उठवायचा म्हटला, तर मी करू शकतो. आम्ही न बोलवता किंवा सांगता देखील नांदेडला ५० ते ७० हजार लोक हजर होते. रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. जर सरकार दखल घेत नसेल आणि आम्ही करायचंच असेल तर करू शकतो. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा”, असे संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.
“आमची परीक्षा घेऊ नका”
दरम्यान, “आमची परीक्षा घेऊ नका. सरकारने ठरवावे , तेव्हा बैठकीला बसायची आमची तयारी आहे. पण सरकारची तयारी नसेल, तर रायगडावर बसून आमची मूक आंदोलनाची तयारी आहे. मग नांदेडला जशी गर्दी जमली, तशी गर्दी जमली तर मी जबाबदार राहणार नाही. हे चालेल का सरकारला?” असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी आपण समाजाला वेठीला न धरता एकटे आंदोलन करू, ज्यामुळे करोनामध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असेही नमूद केले.
“आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत म्हटले आहे की, १८८५ कोटी रुपयांचा निधी वाटला. हे अधिकारी लोकं एवढे फसवतात. हे पैसे सरकारने दिलेले नसून बँकांनी दिलेले आहेत. हे मागच्या सरकारने केलेले आहे. तुम्ही किती दिले हे अधिकाऱ्यांनी सांगावे . आत्ता जाहीर केले साडेबारा कोटी रुपये. जे पूर्वीच्या सरकारने दिले , त्यापुढे आत्ताच्या सरकारने काहीही केलेले नाही”, असेही संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.