MaharashtraNewsUpdate : आमच्यापासून कोणीही भयभीत होण्याची गरज नाही, सर्वांनी एकत्र येणे गरजेचे : मोहन भागवत

मुंबई : ‘आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो. इथे दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही, राष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भागवत यांनी आज मुंबईतील मुस्लिम समाजातील व्यक्तींशी संवाद साधला. भारत भविष्यात महाशक्ती होईल, ते इतरांना घाबरविण्यासाठी नाही. तर तो विश्वगुरूंच्या स्वरूपात विराजमान होईल. युगानुयुगे आपण जड आणि चेतन या दोघांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहोत. हाच आमचा मूलभूत विचार असल्यामुळे आमच्यापासून कोणीही भयभीत होण्याची गरज नाही.” असेही ते म्हणाले.
ग्लोबल स्ट्रेटेजिक पॉलिसी फाऊंडेशनद्वारे मुंबईत आयोजित “राष्ट्र प्रथम – राष्ट्र सर्वोतोपरी” या विषयावर आयोजित संगोष्ठीमध्ये डॉ. मोहन भागवत यांच्यासोबतच केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान व काश्मीर केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू ले. जन. (नि.) सय्यद अता हसनेन यांनी आपले विचार मांडले.
मोहन भागवत आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील उच्चविभूषित व्यक्तींना बोलावण्यात आले होते.
भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम याचे पूर्वज हे एक
‘इस्लाम हा परकीय आक्रमणामुळे भारतात आला आहे आणि हा इतिहास आहे. त्यामुळे तो तसाच सांगितला गेला पाहिजे. यातील आततायी गोष्टी सुशिक्षित लोकांनी समजावून द्यायला हव्यात. कट्टरपंथी लोकांचा विरोध करण्यासाठी आताच जागृत व्हावे लागेल. या जागृतीसाठी जेवढा वेळ लावू तेवढे समाजाचे नुकसान होईल, अशी चिंताही भागवत यांनी व्यक्त केली. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम याचे पूर्वज हे एक आहेत. देश पुढे जायचा असेल तर सर्वांना सोबत जावे लागेल.आमच्या साठी हिंदू हा शब्द आहे, मातृभूमी , गौरवशाली परंपरा आणि आपले पूर्वज यांचा प्रतिशब्द आहे, असे भागवत म्हणाले. तसंच, भारतात दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही. आपल्याला एकट्या मुस्लिम वर्चस्वाची नव्हे तर देशाच्या वर्चस्वाचा विचार करावा लागेल. देशाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे, अस आवाहनही भागवत यांनी केले.
भारतीय संस्कृतीत कुणालाही परके मानलेले नाही
आरिफ महंमद खान म्हणाले की, “विश्वातील विविधतेला ज्या ज्या ठिकाणी बाधा निर्माण केली गेली, त्या सर्व ठिकाणी भयंकर संकटांना तोंड द्यावे लागल्याचा इतिहास आहे. याउलट ज्या ज्या ठिकाणी ही विविधता जपली गेली, तो समाज संपन्न असल्याचे आपण पाहू शकतो. भारतीय संस्कृतीत कुणालाही परके मानलेले नाही. कारण येथे सर्व समान आहेत.”
ले. जन. (नि.) सय्यद अता हसनेन यांनी आपल्या संबोधनातून भारतीय मुस्लिम बुद्धिजीवी समाजाला धोक्याचा इशारा दिला. पाकिस्तान १९७१ पासून व्यापक रणनीती अंतर्गत भारताला रक्तरंजित करण्याचे प्रयत्न करीत आहे. भारत सरकार, भारतीय लष्कर, पोलीस आणि जम्मू-काश्मिरच्या जनतेने गेल्या ३० वर्षांत हे षडयंत्र पार धूळीस मिळविले. परंतु वर्तमान संदर्भात पाकिस्तानद्वारा भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले जाईल. मुस्लिम बुद्धिजीवींनी सावध राहून हे कारस्थान हाणून पाडले पाहिजे.