MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ” त्या ” १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांशी चर्चा

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेऊन हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विनंती पुन्हा एकदा करण्यात आली. या मागणीवर विचार चालू असल्याचे राज्यपालांनी सांगितल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. या भेटीत राज्यातील कोरोनाची माहिती राज्यपालांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आज रात्री मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत महाविकासआघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले होते. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे, या भेटीतून तरी तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या प्रस्तावाला राज्यपालांकडे देऊन ८ महिने होऊनही अद्याप राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज्यपालांना भेटून मुख्यमंत्र्यांनी केली.
गेल्या ६ नोव्हेंबर २०२० ला नवाब मलिक, अनिल परब आणि अमित देशमुख यांनी १२ नावांची यादी राज्यपालांना दिली होती. हा प्रस्ताव देण्याआधी २९ ऑक्टोबर २०२० ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२ नावे मंजूर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली होती.
यामध्ये काँग्रेसकडून १) सचिन सावंत २) रजनी पाटील ३) मुजफ्फर हुसैन ४) अनिरुद्ध वनकर – कला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून १) एकनाथ खडसे २) राजू शेट्टी
३) यशपाल भिंगे – साहित्य ४) आनंद शिंदे – कला तर शिवसेनेकडून १)उर्मिला मातोंडकर २) नितीन बानगुडे पाटील ३) विजय करंजकर ४) चंद्रकांत रघुवंशी आदींचा समावेश आहे.