MaharashtraNewsUpdate : १० दिवसात राज्यातील मंदिरं खुली करा अन्यथा मी आंदोलनाबरोबर : अण्णा हजारे

अहमदनगर : राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आता समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेण्याचे ठरवले असून राज्यातील मंदिरं जर उघडली नाहीतर जनतेसाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही दिला आहे. या विषयावर बोलताना उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? असा प्रश्न उपस्थित करून अण्णा हजारे यांनी म्हटले आहे कि , राज्यात दारूची दुकानं, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाहीये का? जिथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ?
अहमदनगरच्या मंदिर बचाव कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून अण्णा हजारे यांनी राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरं उघडण्यासाठी सरकाराकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती. या शिष्टमंडळाशी बोलताना , मदिरं उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाही. १० दिवसात जर मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर राहील, असा विश्वासही अण्णा हजारे यांनी यावेळी दिला.
दरम्यान भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाही. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी जवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालो आहे. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले ? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावी, अशी मागणीच अण्णांनी केली. यावेळी वसंत लोढा यांनी यावेळी मंदिर बचाव कृतीसमितीने यापूर्वी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती देवून पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृताखाली उग्र आंदोलन करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.