PuneNewsUpdate : बोले तैसा चाले … “नाम” ने दिली “त्या ” १६ लोकांना नवी घरे !!

पुणे : पुण्यात आगीमध्ये घर गमावलेल्या तब्बल १६ लोकांना नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला असून अभिनेते नाना पाटेकर यांनी या सर्वांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या दिल्या आहेत. यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले कि , “आम्हाला घरं जळाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही या गावात आलो. पावसाळ्याच्या आधी ती घरं जळाली होती. मी त्यांना धीर दिला तुम्ही रडू नका, आपण दोन-तीन महिन्यात घरं बांधून घेऊ, असे त्यांना सांगितले होते”.
“यावेळी सर्व पक्षाची मंडळी सोबत होती. चांगलं करायचं म्हटल्यावर सगळी माणसं सोबत असतात. पक्ष बाजूला ठेऊन सर्व लोक एकत्र येतात हे मला बरं वाटतं. मी कुठल्या पक्षाचा नाही. जो चांगल काम करतो त्याला नमस्कार करायचा आणि जो वाईट काम करतो त्यालाही नमस्कार करायचा,” असेही ते म्हणाले. नाना पाटेकर यांनी खडकवासाला धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक लोक या कामात आहेत. सिमेवर सुद्धा ‘नाम’ने ने प्रकल्प उभारला आहे. लेहला वॉटर एटीम सुद्धा उभारले आहेत, प्रत्येक कुटुंबाला एक-एक मशीन दिली आहे, याबाबत नाना पाटेकर यांनी माहिती दिली.
दरम्यान सध्याच्या धार्मिक भेदभावार बोलतांना नाना पाटेकर म्हणाले, “महाराष्ट्रातील माणूस देखील आपला आणि काश्मिरमधील माणूस देखील आपला आहे. माझ्या बहिणीने मुस्लीम धर्मातील युवकाशी लग्न केलं. सर्व भावंडांनी सबंध तोडून टाकली. मात्र मी म्हटलं आपल्याला अब्बाच मिळाला. आपण त्याकडे कसे पाहतो हे महत्वाचे आहे.” यावेळी त्यांनी राजकारणावर बोलण्याचे टाळले. ते म्हणाले कि , कोण काय करतय याकडे मी लक्ष देत नाही मी माझ्या कामात व्यस्त असतो.