MaharashtraNewsUpdate : मंत्रालयासमोर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

मुंबई : दोन दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या गेटवर कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सुभाष जाधव असं या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं राहत होते. या मृत्यूमुळे एकाच खळबळ उडाली असून या प्रकरणी राज्य सरकार आणि गृहखाते काय कारवाई करणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुभाष जाधव मंत्रालयाच्या परिसरात आले होते. त्यानंतर गार्डन परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कीटनाशक प्राशन केल्यानंतर सुभाष जाधव जमिनीवर कोसळले. याच परिसरात तैनात असणाऱ्या पोलिसांच्या लक्षात ही बाब आली. सुभाष जाधव यांना तातडीने जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात जमिनीच्या वादातून सावकराने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती. याबद्दल त्यांनी मंचर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. सावकराने त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आणि राहते घर सुद्धा पाडून टाकले. त्यांनी मुद्दल देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे सुभाष जाधव यांनी पत्रात नमुद केले होते .आज या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.