MaharashtraNewsUpdate : “त्या ” शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची सरकावर टीका

मुंबई : मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावर आज मुंबईत माध्यमांशी बोलातान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत, प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर निशाणा साधला. अशा या परिस्थितीत मला असे वाटते की, या घटनेकडे फार गांभीर्याने बघितले पाहिजे. एकतर त्यांच्या जो प्रश्न आहे, किमान त्यांच्या मृत्युनंतर तरी तो प्रश्न सोडवला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे.” अशी अपेक्षा व्यक्त करीत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. या तीन पक्षांची युती ही अनैसर्गिक असल्याचे टीका करताना त्यांनी तीन पक्षांची तुलना गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांशी केली.
दरम्यान यावर भाष्य करताना फडणवीस यांनी म्हटले आहे कि , “अतिशय दुर्दैवी अशाप्रकारची ही घटना आहे. विशेषता: आता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कुठली व्यवस्थाच उरलेली नाही. जिल्हास्तरावर, तालुकास्तरावरही नाही. ज्या प्रकारे अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होत आहेत, अनेक ठिकाणी त्या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना गरिबाकडे पहायला वेळच नाही. मंत्री, पालकमंत्री, सरकार, मुख्यमंत्री या सर्वांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देणारा एकही निर्णय हे सरकार घेत नाही. आत्महत्या मोठ्य़ा प्रमाणात वाढत आहेत.
“महाविकास आघाडीचे लोक हे अनैसर्गिक युतीने एकत्र आलेले आहेत. विचारसरणी, विचार, गव्हर्नन्स नाही. केवळ सत्तेला चिकटलेले अशा प्रकारचे हे लोक आहे. ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात, त्याप्रमाणे सत्तेला चिकटलेले हे तीन पक्ष…त्यामुळे सत्तेचा वाटा मिळाला नाही की ते ओरड होते. वाटा मिळाला की सगळे बंडोबा थंडोबा होतात.” असेही फडणवीस म्हणाले. याचबरोबर, त्यांनी जनआशीर्वाद यात्रेवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले . “असे आहे की ज्यांना जत्रेचा अनुभव आहे त्यांना यात्रा समजू शकत नाही. मुळातच चारही जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, यामुळे सरकारी पक्ष हलला आहे हे निश्चित.”