CoronaMaharashtraUpdate : राज्यात ४ हजार १४१ नवीन रुग्ण तर ४ हजार ७८० रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ४ हजार १४१ नवीन रुग्णांचं निदान झाले असून १४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. तसेच आज ४ हजार ७८० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३१,९९९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढं झालं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक पाच हजारांहून कमी आढळत आहे. परिणामी राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घसरत आहे. सध्या राज्यातील ३ जिल्ह्यांमध्ये ५ हजाराहून जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२२,९२,१३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२४,६५१ (१२.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,१२,१५१ व्यक्ती होम क्वारन्टाइनमध्ये आहेत, तर २,५२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाईनमध्ये आहेत.
राज्यातील बहुतांश भागातील करोना प्रादुर्भाव सध्या आटोक्यात आला आहे. मात्र काही ठराविक जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. सध्या पुणे जिल्ह्यात १२ हजार ०६९, ठाणे जिल्ह्यात ६ हजार ९८० आणि साताऱ्यात ६ हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल सांगलीत ४५५७, सोलापुरात ४३८२ आणि अहमदनगरमध्ये ४९६३ अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असल्याचं पाहायला मिळत आहे.