Loksabha NewsUpdate : अनिश्चित काळासाठी लोकसभा स्थगित, विरोधकांचा सरकारवर प्रहार

नवी दिल्ली : आजही सरकार आणि विरोधकांच्या गोंळामुळे लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.
संपूर्ण पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरी घोटाळा, कृषी कायदा, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरल्यामुळे संसदेत गोंधळ झाला, त्यामुळे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सरकारने विरोधकांवर तर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न
चौधरी यांनी म्हटले आहे की, लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पेगॅसस हेरगिरी, शेतकरी कायदा आणि महागाई यावर चर्चा करण्यात आली नाही. पेट्रोलच्या दराबाबत विनवणी करूनही सरकारने चर्चा टाळली. फ्रान्स आणि इस्रायल सरकार पेगाससची चौकशी करत आहे. सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्याचा समाजातील प्रत्येक घटकाविरुद्ध गैरवापर होत आहे. आम्ही या विषयांवर सभागृहात चर्चेची मागणी केली होती. एक न्याय्य मागणी होती. बेकायदेशीर नव्हती.
दरम्यान लोकसभा १३ ऑगस्ट रोजी तहकूब होणार होती मात्र, सरकारने ती अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा अचानक निर्णय घेतला. अधिवेशनात कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही. केंद्र सरकारला फक्त विरोधी पक्षांना वाईट दाखवायचे म्हणून हा निर्णय घेतल्याची टीकाही अधीर रंजन चौधरी यांनी केली.
लोकसभेत काय झाले ?
याबाबत बोलताना, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, अधिवेशनातील कामकाज अपेक्षेप्रमाणे नव्हते. अधिवेशनात संविधानाच्या १२७ व्या सुधारणा विधेयकासह एकूण २० विधेयके मंजूर करण्यात आली. ६६ प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. सदस्यांनी नियम ३७७ अंतर्गत ३३१ बाबी मांडल्या. यावेळी काम २१ तास १४ मिनिटे करण्यात आले. ९६ तासांपैकी एकूण ७४ तास आणि ४६ मिनिटे काम करता आले नाही.