Maharashtra Rain Update : पुणे , सातारा आणि कोकणात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : राज्यात यावर्षी पहिल्यांदाच झालेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यातून लोक सावरत असतानाच हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. विशेष म्हणजे पाऊस आणि पुरामुळे त्रस्त झालेल्या भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० जुलैपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. आतापर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु परिस्थिती अतिवृष्टीच्या पलीकडे गेली होती आणि पूर परिस्थितीला कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर , सातारा या जिल्ह्यांना सामोरे जावे लागले.
27/7, Latest satellite obs at 8.30 am indicates scattered type if clouds over M Mah ghats Pune Satara and Konkan Area, and little dense clouds obs over parts of N Vidarbha side and above MP around dense clouding
Pl Follow IMD Updates.
Happy MoES Foundation Day to All. pic.twitter.com/eFwki0tNK8— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 27, 2021
दरम्यान तूर्त थांबलेल्या पावसामुळे विस्कटलेले जनजीवन आता पुन्हा एकदा पुर्वपदावर येत असले तरी अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज (२७ जुलै) आणि उद्या (२८ जुलै) पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर येत्या ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार २९ आणि ३० जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे ऑरेंज अॅलर्ट जारी केला असून पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे.