Maharashtra Flood Update : राज्यातील पूरग्रस्तांना राज्य सरकारची मदत जाहीर

मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये रोख आणि पाच हजार धान्य रुपाने मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
याबाबत प्रसार माध्यमांना अधिक माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले कि , याशिवाय पूर्णपणे घर पडलं असेल त्याला देखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटुंबास दिले जातील.
दरम्यान सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलं होतं.