MaharashtraRainUpdate : पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री , नारायण राणे आणि फडणवीस यांचे दौरे

मुंबई : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून विविध दुर्घटनांमध्ये १४५ लोकांचा बळी गेला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शहरं आणि गावातील घरे पाण्याखाली गेली. तर रायगड, सातारा जिल्ह्यासह काही ठिकाणी दरडी कोसळून मोठी जीवित हानी झाली. दरम्यान, पावसाने तूर्त विश्रांती घेतल्यामुळे पुराचे पाणी ओसरत असून, मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे.
दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळोई येथील ग्रामस्थांचे सांत्वन केल्यानंतर आज ते पुराचा फटका बसलेल्या चिपळूणला भेट देत आहेत. सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणकडे रवाना झाले. आपल्या या भेटीत उद्धव ठाकरे चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत. याशिवाय विरोधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत.
सध्या पाऊस थांबला असला, तरी कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत. चिपळूण, महाडमध्ये पूराचं पाणी ओसरलं असलं, तरी आता सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे. रायगडमध्येही भूस्खलन झालेल्या ठिकाणी पाऊसाने विश्रांती घेतल्यानं मदतकार्याला वेग आला आहे. दरम्यान, पुरग्रस्त भागातील परिस्थिती संथगतीने पूर्वपदावर येताना दिसत आहे.
Started from Mumbai to visit flood affected areas of Konkan with @Dev_Fadnavis ji @mipravindarekar ji@PMOIndia pic.twitter.com/sfOJ5ykAko
— Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) July 25, 2021
नारायण राणे यांनी ट्वीट करून आपल्या दौऱ्याची माहिती देताना म्हटले आहे कि , “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत”.