MarathawadaNewsUpdate : तिरुपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या ४ भाविकांचा अपघातात मृत्यू , अन्य तीन जखमी

उस्मानाबाद : तिरुपती बालाजीला दर्शनासाठी सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरून तिरुपतीच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला एका आयसर टेम्पोने भीषण धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत झालेले चारही जण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील तेरखेडा गावच्या परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला, पाठीमागून आलेल्या आयसरने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत तिरुपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या चार जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मयत चारही जण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत. या भीषण अपघातात अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
गुरुवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमींना उपचारासाठी उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त टेम्पो ट्रॅव्हलर पंक्चर झाल्यामुळे तेरखेडा येथील माऊली हॉटेलजवळ हा टेम्पो उभा करण्यात आला होता. यावेळी काहीजण गाडीतच बसले होते. दरम्यान याच मार्गानं उस्मानाबादकडे जाणाऱ्या आयसरने या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टेम्पो ट्रॅव्हरलाचा चुराडा झाला आहे.