MumbaiNewsUpdate : अखेर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून घेतला असल्याचे वृत्त आहे. याबाबत कंपनीने निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जीव्हीके आणि अदानीमधील कराराला हिरवा कंदील दिला होता मात्र इतर काही खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणे बाकी होते . आता त्याला मंजुरी मिळाल्याने व्यवस्थापनाचा ताबा घेतला आला आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुप सोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे असणारा ५०.५ टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचे निश्चित झाले होते त्यानुसार कंपनीने मुंबई विमानतळामध्ये वाटा असणाऱ्या दोन दक्षिण आफ्रिकन कंपन्यांशीही करार करुन त्यांच्याकडील २३.५ टक्के वाटा आपल्या नावावर करण्याचाही करार केला होता.
कंपनीच्या वतीने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , “विमानतळ पर्यावरणस्नेही करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात संबंधित व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करू. यामध्ये मनोरंजन, ई-कॉमर्स यासारख्या संकल्पनांचा समावेश आहे.”.
दरम्यान मार्च २०१९ मध्ये बिडवेस्टचे १३.५ टक्के वाटा अदानी समूहाला विकण्यासाठी एक हजार २४८ कोटींचा करार केला होता. जीव्हीकेकडून वाटा ताब्यात घेण्याची लढाई थेट न्यायालयापर्यंत गेली होती. तेव्हा जीव्हीकेने आपल्या विमानतळामधील ७९ टक्के वाटा विकून पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला. तरी सीबीआयची चौकशी आणि इतर कायदेशीर बाबींमुळे जीव्हीके समूहाला पैसा उभे करणे जमले नाही. अखेर कर्जाचा वाढते ओझे आणि इतर बाबी लक्षात घेत अदानींनाच हा वाटा विकण्यासाठी जीव्हीकेला निर्णय घ्यावा लागला.
देशातील जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. या शिवाय लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.