MaharashtraNewsUpdate : वादग्रस्त संभाजी भिडे यांचे पुन्हा वक्तव्य , खरे देवभक्त असाल तर कुलूप तोडून मंदिरात जा …!!

सांगली: कोरोना म्हणजे शासनाने उठवलेले थोतांड आहे. कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद असून देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. माझे केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरेच देवभक्त असाल तर मंदिरांची कुलूपं तोडून आत जाऊयात, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे.
संभाजी भिडे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. दरम्यानच्या काळात त्यांनी कोरोना संदर्भात केलेल्या वक्तव्यावर चांगलीच टीका झाली होती. या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत त्यांनी आणखी भर घातली आहे. सांगलीत पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, कोरोना म्हणजे थोतांड आहे. हे शासन हा थोतांडपणा वाढवत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळेच अधिक नुकसान होत आहे. सगळं मोकळं करू देत. काहीही देशात वाटोळं होणार नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जेवढं नुकसान झालंय, त्याच्या एक अब्जांश देखील वाटोळं होणार नाही. सरकार लॉकडाऊन लावतंय ते शंभर टक्के चूकच आहे.
यावेळी त्यांनी कोरोनामुळे मंदिर बंद ठेवल्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, देव सध्या कुलूपबंद आहेत. गावोगावच्या मंदिरांची कुलूपं तोडून टाकू. माझं केवळं महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरंच देवभक्त असाल तर हे कुलूप तोडून आत जाऊयात.