MaharashtraPoliticalUpdate : संजय राऊत यांनी एकाच दगडात मारले तीन राजकीय पक्षी !!

पुणे : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी राज्यात अनलॉकसंदर्भात झालेल्या गोंधळावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. दरम्यान काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर बोलताना, काँग्रेस केंद्रात सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेत, असा टोला मारला.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले कि , काँग्रेस स्वबळावर केंद्रात सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छा. स्थानिक पातळीवर आघाडीनं एकत्र लढावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नाना पटोले स्वबळावर लढणार असतील तो त्यांचा निर्णय असेल. पण मग केंद्रातही स्वबळावर निवडून यावं आम्ही पाठिंबा देऊ, असंही संजय राऊत म्हणाले.
चंद्रकांत दादा म्हणजे वसंतदादा नाहीत याचे भान ठेवा
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. प्रभाग तोडफोडीचा आरोप करणाऱ्या भाजपने गेल्यावेळी पुण्यात तेच केलं असं म्हणत पाठीत खंजीर खूपसणं ही सेनेची संस्कृती नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच चंद्रकांत दादा म्हणजे काही वसंतदादा पाटील नाहीत त्यांनी बोलताना भान ठेवावं, असा सल्ला राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.जिथं सेनेचे पाय खेचण्याचे प्रयत्न होतील तिथं तिथं मी जाणार असं म्हणत आगामी पुणे मनपात सेना किंग किंवा किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडेही आमचं लक्ष असल्याचंही संजय राऊत सांगायला विसरले नाहीत. महाविकास आघाडीत सर्व व्यवस्थित असून राज्यातलं आघाडी सरकार नीट चाललं असल्याचंही ते म्हणालेत.
अनलॉक होतेय ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तो निर्णय घेतला आहे. जनतेला त्रास न होता नियमांची आखणी केल्याचंही राऊत म्हणालेत. तसंच विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरुन थोडीफार गडबड झाली. पण महाविकास आघाडीत हे असं होतं राहतंच. पण सरकार मजबूत असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.