ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा करणार : पंकजा मुंडे

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसींचे आरक्षण परत मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावरील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही त्यांनी आज जाहीर केले आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते डाक पाकिटाचे अनावरण करण्यात आले . गोपीनाथ गडावरुन आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावरुन पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर तोड डागली.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- पंकजा मुंडे
दरम्यान गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मुंडेसाहेब आज असते तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. पण आज मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. ओबीसी समाजाला न्याय मिळायला हवा. न्याय मागणारा पेटून उठला की न्याय मिळतो. दरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एक पत्र लिहिणार असल्याची माहिती पंकजा यांनी यावेळी दिली. त्यात ओबीसींची जनगणना करा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ज्याला रोजगार नाही त्याला रोजगार द्या, अशा तीन मागण्यांचे पत्र आपण पंतप्रधानांना लिहिणार असल्याची त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय. त्याचबरोबर आमच्या नेत्याचे डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार त्यांनी मानले आणि गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.