MaharashtraNewsUpdate : १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग उच्चांक गाठत असल्याने देशभरात भीतीचे वातावरण होते . पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेले आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केले . त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेले आहे, मात्र अजुन यश मिळालेले नाही,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केले आहे.
देशातील काही राज्यांत कोरोनाच्या दुसऱ्या संसर्गाची लाट कमी होताना दिसत असली, धोका कायम आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीतील नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मात्र, मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. त्यातच करोनाचे नवीन म्युटेंट लहान मुलांसाठी घातक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या आरोग्यबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात लहान मुले आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक निर्माण करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”“पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झाला. सध्या दुसरी लाट आहे. ज्यात आपण अनुभवतोय की युवा आणि मध्यमवयीन नागरिकांना संसर्ग होत आहे. आता मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्याच्यात ही लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणं हे काही शक्य नाही. करोनाविरोधातील लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे” .
घाबरण्याचे कारण नाही मात्र दक्षता नक्की घ्यायला हवी…
करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, पण नागरिकांनी घाबरू नये. घाबरण्याचे कारण नाही. मात्र दक्षता नक्की घ्यायला हवी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. सध्याच्या लाटेत आपल्याला ऑक्सिजनसह अन्य बाबींचा तुटवडा जाणवला. भविष्यात आणखी तुटवडा जाणवू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसात मला महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यावर सोपवलेली आहे. महाविकास आघाडी सरकारची सहा कोटी नागरिकांसाठी दोन डोस याप्रमाणे १२ कोटी डोस एकरकमी घेण्याची तयारी आहे. मात्र दुर्दैवाने अजुनही लस पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण काही दिवसांसाठी स्थगित करावं लागलं,” अशी खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.