MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्र्यांनी साधला खासगी डॉक्टरांशी संवाद

मुंबई : राज्यात येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेचा आणि सध्या चालू असलेल्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मुंबईतल्या ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांना कोरोनाबाबतीतल्या वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन करीत त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले . आत्तापर्यंत मुंबईतल्या एक हजार डॉक्टरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे याविषयी यावेळी माहिती देण्यात आली तसेच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या उपक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्र करत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले . यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे.
घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी या डॉक्टरांना आपल्या परिसरातल्या कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांमध्येही सेवा बजावण्याचं आवाहन केले. आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ काळासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.