MumbaiNewsUpdate : BadNews : विरार येथे रुग्णालयात आग , १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

मुंबई : नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती.स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.
यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.
या आगीत मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे
१. उमा सुरेश कनगुटकर
२. निलेश भोईर
३. पुखराज वल्लभदास वैष्णव
४. रजनी आर कडू
५. नरेंद्र शंकर शिंदे
६. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
७. कुमार किशोर दोशी
८. रमेश टी उपयान
९. प्रविण शिवलाल गोडा
१०. अमेय राजेश राऊत
११.रामा अण्णा म्हात्रे
१२. सुवर्णा एस पितळे
१३. सुप्रिया देशमुखे
या दुर्घटनेमध्ये संपूर्ण आयसीयू बेचिराख झाले आहे. याठिकाणी आयसीयूमध्ये डॉक्टरच नव्हते असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई केली जावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे.