CoronaMaharashtraUpdate : कोरोनाचा उद्रेक चालूच , राज्यात नवे रुग्ण ५० हजाराच्या दिशेने , २७७ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक चालूच असून गेल्या २४ तासांत राज्यात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४७, हजार ८२७ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ १ हजार ६२० ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. आज राज्यात एकूण २७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २०२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ३७ हजार ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्क्यांवर आले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखांच्या पुढे
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३ हजार ५९९ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ६० हजार ८४६ इतका आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५२ हजार ४०८ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४८ हजार ६६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजार ५१२ इतकी आहे.
या बरोबरच औरंगाबादमध्ये १४ हजार ३०२, अहमदनगरमध्ये १२ हजार ८८१ इतकी आहे. तसेच नांदेडमध्ये ही संख्या १० हजार ७०२ इतकी आहे. जळगावमध्ये ७ हजार ६४१, तर रायगडमध्ये एकूण ५ हजार २५१ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ४४०, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९५१ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ४९७ इतकी आहे.
२१,५७,१३५ व्यक्ती होम क्वारंटाईन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ०३ लाख ४३ हजार १२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९ लाख ०४ हजार ०७६ (१४.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ५७ हजार १३५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १८ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.