MumbaiNewsUpdate : धक्कादायक : मनसुख हिरेन यांच्या खुनाचा असा होतो आहे उलगडा …

मुंबई : ठाणे न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे देण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे एनआयएकडे सोपवण्यात आले असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन यांना कळवाच्या खाडीत फेकून देण्यात आले होते, असा तपासात खुलासा झाला आहे.
तपासात आढळून आलेल्या माहितीनुसार निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याने मनसुख हिरेन यांना ठाण्यातील घोडबंदर रोड येथे फोन करून बोलावले होते. यावेळी त्याने तावडे नावाच्या पोलिसाच्या नावाने मनसुख यांना फोन केला होता. तावडे हे मुंबईत सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत होते. मनसुख यांना फोन करण्यासाठी विनायक शिंदे यांने बनावट सिमकार्डचा वापर केला होता. हे सिमकार्ड गुजरात येथील एका मित्राकडून मागवण्यात आले होते. एकूण 14 सिमकार्ड होते, त्यापैकी एक सिमकार्ड विनायक शिंदेने वापरले.
दरम्यान मनसुख हिरेन ठाण्यात पोहोचल्यानंतर गाडीतच बेशुद्ध करण्यात आले होते . त्यांचे तोंड झाकण्यासाठी विनायक शिंदे याने अनेक रुमालाच वापर केला होता. याच रुमालाचा त्याने दोरी म्हणून सुद्धा वापर केला होता. त्यानंतर हिरेन यांना कळवा खाडीत टाकण्यात आले. मिळालेल्या अहवालानुसार, हिरेन यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पण जेव्हा त्यांना खाडीत ढकलण्यात आले होते, तेव्हा ते जिवंत होते. खाडीत टाकण्यापूर्वी विनायक शिंदेने मनसुख यांची सोन्याची अंगठी, साखळी आणि महागडी घडी काढून घेतली होती.
एनआयएने हा सर्व प्रकार एपीआय सचिन वाझे यांच्या आदेशानुसार करण्यात आला आहे, असा आरोप केला आहे. हा संपूर्ण कट सोबू हॉटेलमध्ये रचला होता. या प्रकरणात शिंदेने आणखी लोकांची मदत घेतली असावी असा संशय एनआयएला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन यांची हत्या का करण्यात आली असावी, याचा हेतू आता स्पष्ट झाला आहे. मनसुख हिरेन यांचा जिलेटिन ठेवलेल्या कार प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास आता एनआयएची टीम करत आहे.